Type Here to Get Search Results !

श्री. लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन

श्री. लाल बहादूर शास्त्री  मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन 

Lal bahadur shashtri marathi

श्री. लाल बहादूर शास्त्री


श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला. लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्याड तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली.


लहान गावात लालबहादूर यांचे शालेय शिक्षण यथातथाच झाले. मात्र तरीही गरीबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले.
उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. घरी सर्वजण त्यांना “नन्हे” नावाने हाक मारीत. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. कडक उन्हाळयातही तापलेल्या रस्त्यावरुन ते शाळेत जायचे. वयात आल्यावर, लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढयात रुची निर्माण झाली. भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ अकरा वर्षांचे होते, आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली.

गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून‍ शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना हादरा बसला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न असफल ठरले. लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता. त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहित होते की एकदा निर्णय घेतला की ते तो कधीही बदलणार नाहीत, कारण बाहेरुन मृदू वाटणारे शास्त्री आतून एखादया खडकासारखे कणखर होते.

ब्रिटीश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले. येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव “शास्त्री” होते. मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले.

1927 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांची पत्नी ललिता देवी हया त्यांच्याच शहराजवळील मिर्झापूर येथील होत्या. त्यांचा विवाह पारंपारिक पध्दतीने पार पडला. हुंडा म्हणून एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड होते. यापेक्षा अधिक त्यांना आणखी काही नको होते.
1930 मध्ये, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली. स्वातंत्र्याच्या या संग्रामाने ते अधिक परिपक्व झाले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली, त्यापूर्वीच राष्ट्रीय संग्रामातील नेत्यांना नम्र आणि विनित लाल बहादूर शास्त्री यांचे महत्त्व लक्षात आले होते. 1946 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले, तेव्हा या “छोटया डायनॅमो”ला देशाच्या कारभारात रचनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी सांगण्यात आले. त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावर आरुढ झाले. त्यांची कठोर मेहनत करण्याची क्षमता आणि त्यांची कार्यक्षमता उत्तर प्रदेशात एक लोकोक्ती बनली. 1951 मध्ये ते नवी दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती. एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी या घटनेबाबत संसदेत बोलताना लालबहादूर शास्त्री यांची इमानदार वृत्ती आणि उच्च आदर्शमूल्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की शास्त्री यांचा राजीनाम मी स्वीकारत आहे कारण यामुळे घटनात्मक मर्यादेमध्ये एक उदाहरण कायम राहील. जे काही घडले त्याला शास्त्री जबाबदार नाहीत. रेल्वे अपघातावरील दीर्घ चर्चेला उत्तर देताना लाल बहादूर शास्त्री म्हणाले “कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की कणखर होऊ शकत नाही. जरी मी शारीरिकदृष्टया धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवतही नाही.”
आपल्या मंत्रालयीन कामकाजादरम्यान, काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यवहाराकडेही त्यांनी लक्ष दिले आणि त्यात भरीव योगदानही दिले. 1952, 1957 आणि 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील पक्षाच्या निर्णायक आणि जबरदस्त यशामध्ये त्यांचे संघटनात्मक कौशल्य आणि एखाद्या गोष्टीची जवळून पारखण्याची त्यांची क्षमता यांचे मोठे योगदान होते.

तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपले गुरु महात्मा गांधीच्या शैलीत ते एकदा म्हणाले. “कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.” महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले.

लाल बहादूर शास्त्री छान गोष्टी -1 :-

आपल्या गरीब आई-वडिलांवर ओझे व्हायला नको आणि त्यांचे पैसेही वाचावेत; म्हणून प्रतिदिन गंगा नदी पोहून शाळेत जाणारा असामान्य धाडसी बालक लाल बहादूर शास्त्री !

‘एक मुलगा काशीतील ‘हरिश्चंद्र हायस्कूल’ मध्ये शिकत होता. त्याचे गाव काशीपासून ८ मैल दूर होते. तो तिथून प्रतिदिन चालत शाळेत यायचा. वाटेत येणार्या गंगा नदीला पार करून शाळेत यावे लागत असे. त्या काळात गंगा पार करण्यासाठी नावाड्याला दोन पैसे द्यावे लागत. दोन पैसे जाण्याचे आणि दोन परत येण्याचे, म्हणजे त्या काळातील एक आणा; म्हणजे प्रतिमास जवळपास दोन रुपये व्हायचे. तेव्हा सोन्याचा भाव शंभर रुपये प्रति तोळ्याहून न्यून होता, त्या काळी ही रक्कम पुष्कळच होती.

त्या मुलाने आपल्या आई-वडिलांवर पैशाचा भार नको, असा विचार केला आणि त्यांच्याकडे पैसे न मागता तो पोहायला शिकला. उन्हाळा, पावसाळा किंवा थंडी कोणत्याही ऋतूत नित्यनेमाने पोहून गंगा पार करून शाळेला जायचा त्याचा नेम बनला होता. असे बरेच दिवस गेले. एकदा पौष मासातील थंडीत सकाळच्या शाळेसाठी तो गंगेत उतरला. पोहत-पोहत नदीच्या मध्यभागी आला. एका नावेतून काही यात्री नदी पार करत होते. त्यांनी पाहिले, एक लहान मुलगा नदीत बुडत आहे, असे समजून त्यांनी नाव त्याच्याजवळ घेतली आणि त्याला हाताला धरून वर ओढून नावेत घेतले. त्या मुलाच्या चेहर्यावर भीती, काळजीचा लवलेशही नव्हता. त्याचे असामान्य धाडस पाहून सर्व लोक आश्चर्यचकीत झाले!

लोक : तू आता बुडून मेला असतास तर ? असे धाडस करणे, योग्य नव्हे !

मुलगा : साहस हा गुण आहे, धाडसी असायलाच हवे. आयुुष्यात विघ्न-संकटे येणारच, त्यांना सामोरे जाण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी धाडस हवेच. आतापासून धाडसी नाही झालो, तर जीवनात मोठमोठी कामे कशी करता येतील ?

लोक : अशावेळी पोहायला कशाला आलास ? दुपारी यायचे ?

मुलगा : मी पोहायला नदीमध्ये उतरलो नाही. मी तर शाळेत चाललो आहे.

लोक : नावेत बसून जायचे !

मुलगा : प्रतिदिन चार पैसे लागतात. माझ्या गरीब आई-वडिलांवर मला ओझे बनायचे नाही. मला स्वतःच्या पायांवर उभे रहायचे आहे. माझा खर्च वाढला तर, आई-वडिलांची चिंता वाढेल. त्यांना घर चालवणे अवघड होईल.

लोक त्याच्याकडे आदराने पहात राहिले, तो मुलगा पुढे भारताचा पंतप्रधान बनला. कोण होता तो मुलगा ? ते होते लाल बहादूर शास्त्री. एवढ्या उच्च पदावर असतांनाही त्यांच्या मध्ये सत्य, निर्मळपणा, प्रामाणिकपणा, साहस, साधेपणा, देशप्रेम इत्यादी सद्गुण होते आणि सदाचाराचे ते मूर्तीमंत स्वरूप होते. असे महापुरुष अल्प काळ राज्य करूनसुद्धा जनसामान्यांवर आपला प्रभाव सोडून जातात.’

लाल बहादूर शास्त्री लहानपणी च्या गोष्टी -2
भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री म्हणजे साधेपणा आणि महानतेची प्रतिकृती होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेरणादायी आहेत. ते देशाचे पंतप्रधान असतानाची गोष्ट आहे. एका दिवशी ते कापड गिरणी पाहण्यासाठी गेले. त्यांच्याबरोबर गिरणीचा मालक, उच्च अधिकारी व इतर महत्त्वाचे लोक होते. गिरणी पाहिल्यानंतर शास्त्रीजी गिरणीच्या गुदामात गेल्यानंतर त्यांनी साड्या दाखवायला सांगितले. गिरणी मालक आणि अधिकार्‍याने एकापेक्षा एक सुंदर साड्या त्यांना दाखवल्या. शास्त्रीजी साड्या पाहून म्हणाले,' साड्या तर खूप सुंदर आहेत, यांची किंमत काय आहे?'

' ही साडी ८०० रूपयांची आहे आणि हिची किंमत एक हजार रुपये आहे,' गिरणी मालकाने सांगितले. ही तर खूप महाग आहे, मला कमी किमतीच्या साड्या दाखवा, शास्त्रीजी म्हणाले. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट होती की ही घटना १९६५ ची होती, यावेळी एक हजार रुपयांची किंमत खूप होती.

'बरं, ही पाहा. ही साडी पाचशे रुपयांची आहे आणि ही चारशे रुपयांची,' गिरणी मालक दुसर्‍या साड्या दाखवत म्हणाला. 'अरे बाबा, यादेखिल खूप महाग आहेत. माझ्या सारख्या गरीबासाठी कमी किमतीच्या साड्या दाखवा, ज्या मी खरेदी करू शकेल,' शास्त्रीजी म्हणाले. ' वा सरकार, आपण तर आमचे पंतप्रधान आहात, तुम्हाला गरीब कसे म्हणता येईल? आम्ही तर या साड्या तुम्हाला भेट देत आहोत,' गिरणी मालक बोलला.

' नाही बाबा, मी भेट घेऊ शकत नाही', शास्त्रीजी म्हणाले. यावर तो गिरणी मालक अधिकाराने म्हणाला की, 'आम्ही आमच्या
पंतप्रधानांना भेट देणे, हा आमचा अधिकार आहे.'

' हो, मी पंतप्रधान आहे,' शास्त्रीजी शांतपणे म्हणाले.' परंतु, याचा अर्थ असा नाही की ज्या वस्तू मी खरेदी करू शकत नाही त्या वस्तू मी भेट म्हणून स्वीकारू आणि आपल्या पत्नीला देऊ. बाबा, मी पंतप्रधान असलो तरी आहे गरीबच ना. तुम्ही मला स्वस्त साड्याच दाखवा. मी ऐपतीप्रमाणेच साडी खरेदी करेन.'

गिरणी मालकाच्या सार्‍या विनवण्या व्यर्थ गेल्या. देशाच्या पंतप्रधानांनी स्वस्त भावाच्या साड्याच खरेदी केल्या. शास्त्रीजी एवढे महान होते की मोह त्यांना स्पर्शही करू शकत नव्हता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad