Type Here to Get Search Results !

गोपाळकाला मराठी माहिती

गोपाळकाला


कृष्णाष्टमीनंतर दुसरे दिवशी साजरा केला जातो दहीहंडीचा उत्सव. महाराष्ट्रात आणि भारताच्या अन्य राज्यातही हा उत्सव साजरा होतो आणि त्याला आता तर सार्वजनिक स्वरूप आले आहे. या दिवशी उंच जागी दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजविलेली हंडी टांगली जाते आणि गोविदांची पथके एकावर एक थर रचून ही हंडी फोडतात. त्यासाठी मोठमोठी बक्षीसेही लावली जातात. गाणी, नाच, उंच चढणार्‍या गोविंदांच्या अंगावर पाणी फेकून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न असा एकच दंगा यावेळी चाललेला असतो. या मडक्याचा तुकडा मिळाला तर घरी आणून सांभाळून ठेवला जातो. त्याने घरात समृद्धी येते अशी भावना आहे.

उत्सव साजरा करण्याची पद्धत


गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

दहीकाला


विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे `काला' होय. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.
मासिक पाळी, अशौच व स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या दिवशी केलेल्या उपवासाने कमी होतो. तसेच हे व्रत केल्याने संतती, संपत्ती व अंती वैकुंठ लोक यांची प्राप्‍ती होते, असे सांगितले आहे.

गोपाळकाळयाचे आध्यात्मिक महत्त्व


गोपाळकाला म्हणजे पांढर्‍या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समुच्चय. `काला' हा शब्द एकसंध व वेगात सातत्य असणार्‍या क्रियेशी संबंधित आहे. `काला' म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणार्‍या घटनांचे एकत्रीकरण. पूर्णावतारी कार्य हे स्थळ, काळ व स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असेच असते. या कार्यप्रक्रियेत विविधांगी जीवनाचे पैलू आध्यात्मिकरीत्या ईश्‍वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लीलया उलगडून दाखवले जातात. `गोपाळकाला' हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो.

काल्यातील प्रमुख घटक

पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्‍तीचे निदर्शक आहेत.
पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्‍तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी)
दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्‍या मातृभक्‍तीचे प्रतीक
दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्‍तीचे प्रतीक
ताक : गोपींच्या विरोधभक्‍तीचे प्रतीक
लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्‍तीचे प्रतीक या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.

गोविंदा


रात्री १२.४०ला कृष्णजन्मोत्सव साजरा झाला की सूर ऐकू येतात ते...
गोSSSविंदा रे गोSSSपाळा... यशोदेच्या तान्ह्या बाळा,
घरात नाही पाणी घागर, उतानी रे गोपाळा...
आला रे आला, गोविंदा आला...

आपले सगळेच सण आनंद, उत्साह, प्रेमाचा संदेश देणारे... प्रत्येकाची मजा वेगळी, साज वेगळा... मग गोपाळकाल्याचा सणही त्याला कसा अपवाद असणार. एकजूटीचा संदेश देणारा हा खेळ बघायला खूप मजा येते...

पहाटे लवकरच सगळे गोविंदा ग्राममंदिरात (मुंबईतील) एकजूट होतात... दुधादह्याची हंडी
ग्रामदेवते समोर बांधली जाते. तिला झेंडूची फुलं, काकडी, केळीं बांधून सजवली जाते. पुजा, गार्‍हाणे आटोपल्यावर ती हंडी फोडली जाते. फुटलेल्या हंडीचा काला करून सगळ्यांना वाटला जातो. मग गोविंदा पथकाचे मास्तर सर्व गोविंदाना मार्गदर्शन करतात. मास्तरांच्या नेतृत्वाखाली गोविंदा पथकाचे मार्गक्रमण सुरू होते. जवळच्या विभागातल्या मानाच्या हंड्या फोडण्याचा कार्यक्रम पार पडला की सगळे पथक ट्रक, टेम्पो, बस मधे बसून उपनगरातील लोणी लुटायला पसार होतात...

पुर्वी म्हणजे १९८०-८५ पर्यंत गोविंदा पथके जवळच्या भागातील हंड्या फोडत. त्यावेळी ट्रक, टेम्पोचे लाड पुरविण्या इतपत पथकाकडे आर्थिक पाठबळ नसे. तेव्हा बैलगाडीतून कृष्ण, बलराम, राधा, पेंद्या यांची मिरवणूक निघे... गल्लीबोळातून येणारे पाण्याचे फुगे मिरवणूकीचा खरपूस समाचार घेत. बैलगाडी समोरील बँड पथक गोविंदाची नेहमीची धून वाजवताना दिसत. सगळे गोविंदा फेर धरून रस्त्यावरून नाचत, खेळत हंड्या फोडत... पण गोविंदा आता राजकिय झालाय, त्याला लाखोंच लोणी लागलयं. पुर्वीचा ५ ते ६ थरांचा गोविंदा काल चक्क ९ थरांचा झाला.

ठाणे वर्तक नगर मधे काल ९ थरांचा विश्वविक्रम करण्यात आला... तळाच्या थराला ६+२, दुसर्‍या थरला ५+१, तिसर्‍याला ४+१, चौथ्याला ३, पाचव्याला २ आणि त्यावर एकेरीत ४ जण असा मानवि मनोरा माझगांवच्या 'ताडवाडी गोविंदा पथकाने' रचला. तसाच पर्यंत्न जोगेश्वरीच्या 'जय जवान' गोविंदा पथकानेही केला. पण शेवटच्या थरावरील मुलीला वार्‍यापुढे नमते घ्यावे लागले, तेव्हा उपस्थीत हजारो प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. ही जिवघेणी स्पर्धा लाखो प्रेक्षक दुरदर्शन वरून मध्यरात्री पर्यंत पहात होते.

गोविंदा पथकांना या स्पर्धेतील जोखमीची काळजी असते आणि म्हणूनच १ - २ महिना आधीपासूनच त्यांची पुर्वतयारी सुरू होते. वरच्या थरातील लहान गोविंदासाठी खास ट्रेनिंग आयोजीत केले जाते. योग्य संतुलन राखून (Balancing) उंचीची भिती घालवण्यासाठी तरण तलावात २० फुटावरून उड्या मारणे, दोरी वरून चालणे इ. प्रकारांचा सराव करून घेतला जातो. मनोधैर्य स्थिर राखण्यासाठी ध्यानधारणेची मदत घेतली जाते. बहुतांश गोविंदा हे व्यायामशाळेतील कसलेल्या शरिरसौष्ठवाचा पुरेपूर उपयोग करतात.

थर कोसळून होणार्‍या दुखापतीची चिंता न करता हे गोविंदा अथक प्ररिश्रम करत असतात. त्यांची ही अखंड मेहनत, जिद्द, शिस्त या लोकप्रिय खेळाला व्यावसायिक (corporate) दर्जा प्रात्प करून देते.
source: www.m4marathi.com

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.