Type Here to Get Search Results !

Vijayadashami / Dasra विजयादशमी / दसरा हिंदी मराठी इंग्रजी जानकारी

Vijayadashami / Dasra विजयादशमी / दसरा हिंदी मराठी इंग्रजी जानकारी  विजयादशमी / दसरा










आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो . 
देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते जाते 

आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येतो.
महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याची पाने देतात.
 या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. 
सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे,
 तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची, 
तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन,
 व्यापाऱ्याानी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती.
हिंदू पंचांगाप्रमाणे या दिवशी साधारणतः श्रवण नक्षत्र राहते. 
प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता. 
पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत.
 हिंदू धर्मात विजयादशमीच्या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा सण असत्यावर सत्याच्या, 
अधर्मावर धर्माच्या विजयापित्यर्थ साजरा केला जातो. ह्या सणाबाबत तीन आख्यायिका मांडण्यात येतात,
पहिल्या आख्यायिकेत, जेव्हा महिषासुराने संपूर्ण सृष्टीवर हाहाकार माजविला. धर्म संकटात सापडला, 
देव-देवादिक, साधू-संत, सामान्य प्रजेचे जगणे मुश्कील झाले. त्यावेळी सर्व देवांनी शिवपत्नी पार्वतीची 
आराधना केली. पार्वतीने दुर्गेचे रूप धारण करून महिषासुराचा नाश करण्याचे ठरविले. नऊ दिवस चाललेल्या
 ह्या युद्धाची अखेर दसऱ्याच्या दिवशी महिषासुराच्या वधाने झाली.
दुसऱ्या आख्यायिकेत, रामायणात प्रभू श्रीराम आणि लंकापती रावण यांच्यात माता सीतेच्या अपहरणावरून
 झालेल्या युद्धाची सांगताही दसऱ्याच्या दिवशीचीच झाली होती. प्रभू श्रीरामाने दसऱ्याच्या दिवशी मावळत्या 
सूर्याच्या साक्षीने लंकापती रावणाचा वध केला आणि सीता मातेला मुक्त केले. प्रभू श्री रामचंद्रांच्या विजयाच्या
 आठवणी जगाविण्याकरीता ह्या दिवशी रावण दहनाचेही आयोजन करण्यात येते.
तिसऱ्या आख्यायिकेत, महाभारतात द्यूत क्रीडेत पराभूत झाल्यावर पांडवांना आपले राज्य, सर्व संपत्ती
 गमवावी लागली होती. एवढेच नव्हे त्यांना वनवासहि भोगावा लागला होता. वनवासादरम्यान त्यांना आपले
 क्षत्रियत्व लपवावे लागणार होते. त्याकरीता अत्यंत साधी वस्त्र परिधान करून कुठल्याही शस्त्रांवीना पांडवांना 
वनवासात गेले. त्यावेळी पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडात लपवून ठेवली होती. हि शस्त्रे पांडवांनी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर बाहेर काढून त्यांचे पूजन केले होते. म्हणून दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजनही केले जाते.
दसरा हा सण साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असल्याने ह्या दिवशी नवीन कामाचा शुभारंभ, वाहन वा इतर वस्तू खरेदी, 
सोने खरेदी करण्यासही चांगला मानला जातो. विद्यार्थी ह्या दिवशी सरस्वती मातेची पूजा करून विद्याप्राप्तीकारीता 
आराधानाही करतात. तर सायंकाळी सीमोलंघन करून सोने वाटून म्हणजेच आपट्याची पाने वाटून पारंपारिक
 पद्धतीने दसरा हा सण साजरा केला जातो.
सोने  लुटण्याविषयी काही कथा .
विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. 
त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो. 
रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या 
एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या
शहरी वरतंतू ऋ‍षीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत 
झाला, गुरूला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला. 
गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्याचे आभार मानून आपल्या आवडीचा काही 
पदार्थ असल्यास तो सांगावा, म्हणजे गुरुदक्षिणेदाखल तो आणून देईन असे त्याला सांगिलते.
 गुरूने उत्तर दिले:- कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकविणे हे अनुचित कर्म आहे. 
शिष्य विद्वान् झालेला पाहून गुरूस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय. 
परंतु कौत्सास गुरूच्या ऋणात राहणे न आवडून त्याने आग्रह धरला व पुन: पुन: मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? 
असे विचारू लागला. तेव्हा वरतंतू ऋषी म्हणाले,
 मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी 
याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाकडूनच आणून दे. ही अट कौत्साने मान्य करून आपल्या विद्येच्या
 जोरावर तो तेथून बाहेर पडला, परंतु चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच इसमाकडून मिळविणे काही सोपे
 काम नव्हे हे त्याला लवकरच समजले. रघुराजा मोठा उदार व विद्वानांस आश्रय देणारा आहे असे
 त्याच्या कानावर येताच तो त्याच्याकडे गेला, परंतु त्या वेळी रघुराजाने विश्वजित् यज्ञ करून ब्राह्मणांकडून 
सर्व द्रव्यभंडार लुटविले होते, यामुळे त्यालाही अत्यंत गरीबी आलेली होती. कौत्साने त्याच्या 
एकंदर स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर आपली इच्छा येथे सफल होणार नाही असे वाटून त्याला 
दुःख झाले. रघुराजाने आपल्या दारी आलेल्या विद्वान् ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या
 आगमनाचे कारण विचारले. कौत्साने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला, 'राजा, तुला प्राप्त झालेल्या 
स्थितीत माझी मनीषा सफल होण्याचा रंग दिसत नाही. तथापि त्याजबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा
 दाता शोधून काढण्यासाठी जाऊ दे. हे कौत्साचे भाषण ऐकून राजा हसला. त्याने चौदा कोटी सुवर्ण मुद्रा
 तीन दिवसात देतो असे कौत्सास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले. थकलेली बाकी वसूल
 करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी चालविली. ही गोष्ट इंद्रास समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर
 आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षांव करविला. रघुराजाने त्या सर्व कौत्सास दिल्या.
 त्याने त्या वरतंतू ऋषींपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली. परंतु त्याने फक्त १४ कोटी मुद्रा
 ठेवून घेऊन बाकीच्या कौत्त्यास परत दिल्या. त्या त्याने रघुराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. 
शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढीग करून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितले. 
लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली, 
सोने यथेच्छ लुटले व एकमेकांस देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. 
त्या वेळेपासून या विशिष्ट झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याचा प्रघात प्रचारात आला.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.