Type Here to Get Search Results !

26 मार्च - चिपको आंदोलन,मराठी माहिती!

26 मार्च - चिपको आंदोलन,मराठी माहिती!



वृक्षतोड रोखण्यासाठी देशभर गाजलेल्या चिपको आंदोलनाच्या आठवणी गुगलने डूडलद्वारे जागविल्या आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्‍ह्यात १९७० च्या दशकात झालेल्या या आंदोलनाला आज, सोमवारी ४५ वर्षे पूर्ण झाली. 


चिपको आंदोलन हे झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन होते. यामध्ये वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणार्‍या वृक्षाला कवटाळून ठेवले. या आंदोलनामुळे शेकडो झाडांची जंगले, हजारो पक्षी, प्राण्यांची निवासस्थाने वाचली.


ठेकेदार झाडं कापायला असंख्य माणसं घेऊन आला की ‘त्या’ झाडाला घट्ट मिठ्या मारून उभ्या राहायच्या ‘पेड कटने नही देंगे’च्या घोषणा द्यायच्या. एप्रिल १९७३ मध्ये अलकनंदा खोऱ्यातील मंडल गावात ‘चिपको’ आंदोलनाची सुरुवात झाली. अलकनंदा खोऱ्यातील जंगलाचा एक भूभाग क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या एका कंपनीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यातून आंदोलन उभे राहिले. ‘दाशैली ग्राम स्वराज्य संघ’ या स्थानिक संस्थेने शेतीची अवजारे तयार करण्यासाठी राज्य सरकारकडे याच जंगलात वृक्षतोड करण्याची परवानगी मागितली होती; ती नाकारली गेली होती. त्यामुळे साहजिकच व्यापारी कंपनीला दिलेल्या परवानगीला लोकांनी विरोध केला. त्यातून ‘चिपको’ आंदोलन उभे राहिले. त्यात गौरादेवी, सुदेशादेवी, बचनीदेवी यांसारख्या स्त्रिया हिरिरीने उतरल्या. गौरादेवीने गावागावांत फिरून स्त्रियांना एकत्र आणले आणि जंगलात ‘चिपको’ आंदोलन सुरू केले.

जंगलात तब्बल अडीच हजार झाडांचा लिलाव त्यावेळी करण्यात आला. गावातील आंदोलकांनी विरोध केला, तरीही लिलाव झालाच. ठेकेदारांना लोकांच्या विरोधाची कल्पना होती. त्यांनी कार्यकर्त्यांना लोकांची जुनी देणी देण्याच्या निमित्ताने चामोलीत बोलावून घेतले. त्यांच्या गाफीलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांनी गुपचूप रेनीच्या जंगलात मजूर पाठविले. एका छोट्या झाडांची कत्तल करण्यासाठी आलेल्या मजुरांना पाहिलं आणि धावत गावात ही खबर दिली. पण, गावात फक्त १५-२० स्त्रिया आणि काही छोटी मुले होती. पुरुष मंडळींना निरोप कळवून ते परत येईपर्यंत दोन-तीन दिवस लागणार. तोपर्यंत जंगलतोड अटळ होती. हे लक्षात येताच गावातील महिला आपल्या मुलांसह जंगलात आल्या. बायकांसह सगळी लहान मुलं झाडाला चिकटून उभी राहिली. ठेकेदारांनी स्त्रियांना विवस्त्र करण्याच्या धमक्या दिल्या. पण, एकीनीही ठेकेदारांच्या धमक्यांना भीक घातली नाही. शेवटी मजूरांनी माघार घेतली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतात झालेलं हे पहिलंच अनोखं आंदोलन होतं. पुढे हे आंदोलन ‘चिपको’ आंदोलन म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

इतिहास

बिश्नोईंचे हत्याकांड


इ.स. १७३०मध्ये जोधपूरच्या महाराज अभयसिंह यांनी राजवाडा बांधायचा ठरवले. त्यासाठी चुन्याची कळी करायला भरपूर जळण हवे होते. ते शोधताना जोधपूरपासून  सोळाच मैलांवर बिश्‍नोईंचे खेजडली गाव होते. गावाजवळ खेजडीची मुबलक झाडी होती, जवळच चुन्याच्या खाणीही होत्या. राजाचे कामगार कुर्‍हाडी घेऊन खेजडलीला पोचले. बिश्‍नोई लोकांनी विरोध केला. संतप्त दिवाणाने हुकूम केला, "चला, झाडे तोडा.' सारे गावकरी विनवण्या करू लागले, "आमचा धर्म तुडवू नका, ही वृक्षसंपदा नासू नका." वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणार्‍या वृक्षाला कवटाळून ठेवले. त्यात गावातली अमृतादेवी आघाडीवर होती. सैनिकांच्या तलवारीने अमृतादेवीबरोबर गावातले ३६३ गावकरी मारले गेले. आणि बिश्‍नोईंचे जीव गेल्यावर राजाची मग्रुरी उतरली. तो खेजडलीला पोचला, माफी मागितली. यापुढे बिश्‍नोईंच्या गावापासचे एकही हिरवे झाड तुटणार नाही, अशी हमी दिली.

काय होते चिपको आंदोलन?

संपूर्ण भारतामध्ये जंगलतोड रोखण्यासाठी व वनसंपत्तीच्या संवर्धनासाठी गांधीवादी मार्गाने अहिंसक चळवळ करण्यात आली. या आंदोलनाला सुरुवात १९७३ मध्ये तत्‍कालिन उत्तर प्रदेशमधील चमोली जिल्‍ह्यातून झाली. अलकनंदा खोर्‍यातील मंडल गावच्या लोकांनी या आंदोलनास सुरुवात केली. वन विभागाच्या ठेकेदारांनी जंगलातील झाडे तोडण्यास सुरुवात केली होती. तेव्‍हा चिपको आंदोलनाचा जन्‍म झाला. 
आंदोलनात महिला अग्रभागी होत्या. आंदोलनाच्या प्रणेता गौरा देवी होत्या. त्यांना 'चिपको वुमन' या नावानेही ओळखले जाते. झाडे तोडायला आल्यास आंदोलक अहिंसक पद्धतीने झाडाला मिठी मारत आणि झाड तोडण्यापासून परावृत करत होते. गौरा देवी यांच्याबरोबरच धूम सिंह नेगी, बचनी देवी आणि सुदेशा देवी यांनीही या आंदोलनात भाग घेतला. 
यानंतर हे आंदोलन परिसरातील सर्व डोंगरी जिल्‍ह्यांत पसरले. यात पर्यावरणवादी चंडी प्रसाद भट्ट आणि त्यांची संस्‍था दशोली ग्राम स्‍वराज्य संघाचीही महत्त्‍वाची भूमिका होती. ज्येष्ठ गांधीवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांनी या आंदोलनाला दिशा दिली. तत्‍कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वृक्षतोड रोखण्याचे आवाहन केले. तेव्‍हापासून वृक्षतोडीवर निर्बंध घालणारा कायदा झाला. 
आज याच चिपको आंदोलनाच्या ४५ व्या स्‍मृतीदिनानिमित्त गुगलने डूडल बनवले आहे. स्‍वातंत्र्यानंतर पर्यावरण रक्षणासाठी झालेल्या या महत्त्‍वपूर्ण आंदोलनाच्या स्‍मृती जागविल्या आहेत.

१८ व्या शतकातही झाले होते 'चिपको'

भारतात चिपको आंदोलन १८ व्या शतकात राजस्‍थानमध्ये पहिल्यांदा झाले. जोधपूरच्या महाराजांच्या आदेशानुसार झाडे कापली जात होती. त्यावेळी स्‍थानिक बिश्नोई लोकांनी त्याला विरोध केला. हा विरोधही अहिंसक होता. गावातील लोकांनी झाडांना मिठ्या मारल्या. यात महिला आघाडीवर होत्या. शेवटी राजाने आपला निर्णय बदलला व वृक्षतोडीला प्रतिबंध करणारे आदेश दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad