Type Here to Get Search Results !

२२ मार्च – जागतिक जल दिन मराठी माहिती,भाषण,सूत्रसंचालन.

२२ मार्च – जागतिक जल दिन मराठी माहिती,भाषण,सूत्रसंचालन.




एखाद्या महत्वाच्या प्रश्‍नावर आपले लक्ष केंद्रीत करण्यासाठी, आपण त्या प्रश्‍नाचे महत्व जनमानसावर बिंबवण्यासाठी एखादा दिवस राष्ट्रीय दिन म्हणून पाळतो. पाणी प्रश्‍न दिवसेंदिवस आक्राळ विक्राळ रूप धारण करीत आहे. त्यामुळे सामान्य माणसाला पाण्याचे महत्व पटावे म्हणून आपण गेल्या काही वर्षांपासून जागतिक जल दिन साजरा करीत असतो. त्या निमित्ताने पाणी प्रश्‍नावर समाजात उद्बोधक चर्चा व्हावी, पाणी प्रश्‍नाचे खरे रूप सामान्य माणसाला कळावे, जनतेनी तो प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने काही संकल्प करावेत या दृष्टीने दर वर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून पाळला जातो.

हा जागतिक दिन साजरा करणे सुरू करण्याचा मान एका भारतीयाला जातो हे आपल्याला माहित आहे काय ? जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ, स्टॉकहोम जल पुरस्काराचे विजेते डॉ. माधवराव चितळे यांनी हा प्रश्‍न सर्वप्रथम जागतिक मंचावर मांडला. त्यावर भरपूर चर्चा होवून २२ मार्च हा दिवस निवडण्यात आला. सुरूवातील हा दिवस निवडण्याबद्दल जल तज्ज्ञात मतभेद होते. काही जण २२ मार्च बद्दल तर काही जण २२ सप्टेंबर बद्दल आग्रही होते. विषुववृत्ताने पृथ्वीचे दोन भाग पडतात. त्याचे वरचा एक भाग तर त्याचे खालील एक भाग. वरच्या भागातील देशांना २२ मार्च ही तारीख पसंत होती तर खालच्या भागातील देश २२ सप्टेंबर बद्दल आग्रही होते. खालच्या भागातील देशांपेक्षा वरच्या भागात जास्त देश आहेत हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर २२ मार्च तारीख निश्‍चित झाली हे सांगायला नको.

२२ मार्च ह्या दिवसाचे असे काय वैशिष्ट्य आहे की हा दिवस निवडला जावा ? दरवर्षी पावसाळा सुरू होण्यासाठी २२ मार्च पासून वातावरण बदल व्हावयास सुरूवात होते. त्यामुळे तात्विक दृष्ट्या पावसाळ्याची सुरूवात होण्यासाठी हा दिवस कारणीभूत ठरतो हा तर्क वापरून हा दिवस निवडण्यात आला.

पाण्याशी निगडीत खरे प्रश्‍न कोणते ?


एखादी गोष्ट अति परिचित असली तर त्या गोष्टीबद्दल जास्त अज्ञान असते. पाण्याबाबत नेमकी हीच परिस्थिती आहे. याचा वापर करावयाची आपल्याला इतकी सवय लागून गेली आहे की त्याच्याशी निगडीत प्रश्‍न सतत दुर्लक्षिले जातात. पाण्याशी संबंधित प्रश्‍न नेमके कोणते आहेत त्यांची आपण यादी करू या.

१. पाण्याकडे पहाण्याची मानसिकता कशी बदलता येईल ?
२. पावसाच्या पध्दतीत होणार्‍या बदलांची नोंद घेवून पाण्याची साठवणूक कशी करता येईल ?
३. भूजलाची घसरती पातळी कशी थांबविता येईल ?
४. नद्यांचे बारमाहीकरण कसे करता येईल ?
५. तलावांवरील आक्रमण थांबवून त्याचे संवर्धन कसे करता येईल ?
६. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेवून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल ?
७. पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल ?
८. पाण्याचा अधिक उत्पादक पध्दतीने वापर कसा वाढविता येईल ?
९. पाणी वितरणाचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल ?
१०. पाण्याचे सरकारीकरण कसे थांबविता येईल ?

मानसिकतेत बदल :


पूर्वीचे काळी लोकसंख्या खूप कमी होती. त्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता जास्त होती. आता लोकसंख्या वाढीमुळे दरडोई उपलब्धता घसरली आहे. पण माणसाने पाण्याच्या वापरात मात्र काहीच बदल केले नाहीत. या उलट पाणी वापराचे नवनवीन मार्ग मात्र तो शोधित असतो. त्यामुळे पाणी प्रश्‍नाची तीव्रता वाढतच चालली आहे. ती थांबवायची असेल तर आपण आपली मानसिकता बदलून पाणी बचतीचे नवनवीन मार्ग शोधून काढावयास हवेत.

पावसाचे पध्दतीत बदल :


हवामानात होत चाललेल्या बदलामुळे पावसाच्या पध्दतीत झपाट्याने बदल होत आहेत. पावसातील नियमितपणा कमी होवून तो बेभरवशाचा होत आहे. पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. त्या बरोबर पावसाचा वेगही वाढत चालला आहे. वेगाने पडणारा पाऊस वेगाने वाहून जातो व आपले भांडे मात्र रिकामेच राहते. त्यामुळे पावसातील बदलांची नोंद घेवून आपल्याला त्याचा संग्रह कसा करता येईल याचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.

भूजलाची घसरती पातळी :


पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी आपण भूजलाचा उपसा भरमसाठ वाढविला आहे. कोणत्याही प्रकारचे जल पुनर्भरण न करता निव्वळ उपसा वाढविल्यामुळे भूजल पातळी वेगाने घसरत आहे. भूजल साठे खरे पाहिल्यास राखीव स्वरूपाचे साठे आहेत. ते हात राखूनच वापरले जावेत. पण आपण मात्र आपल्या ऐहिक सुखासाठी वेगाने उपसा केल्यामुळे आज भूजलावर संकट आले आहे. हे असेच चालू राहिले तर निसर्ग आपल्याला कधीच माफ करणार नाही. कृत्रिम पध्दतीने जलसाठे कसे वाढविता येतील याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ येवून ठेपली आहे.

नद्यांचे बारमाहीकरण :


वेगाने नद्यांचे पाणी वाहून जात असल्यामुळे पावसाळा संपताच नद्या कोरड्या पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नद्या पूर्वीसारख्या बारमाही कशा वाहू शकतील याचा विचार करावा लागणार आहे. धुळे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात या बाबत यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. त्या प्रयोगांचे यशापयश तपासून तशी योजना देशभर राबविता येणार नाही काय याचा विचार गंभीरपणे केला जावा.

तलावांचे पुनरूज्जीवन :


ग्रामीण भागातील पाणी पुरवठा आणि सिंचन या साठी तलावांचे पुनरूज्जीवन अत्यंत निकडीचे आहे. पूर्वी भारत हा तलावांचा देश म्हणून प्रसिध्द होता. आज तलावांवरील अतिक्रमाणांमुळे कित्येक तलाव बुजवण्यात आले. एवढेच नव्हे तर वाढत्या नागरी वस्तींची गरज भागविण्यासाठी तलावांचे आकार घटत आहेत. यामुळे ग्रामीण पाणी प्रश्‍नाने गंभीर रूप धारण केले आहे. यासाठी सरोवर संवर्धिनीसारखी चळवळ उभारावी लागणार आहे.

पाण्याचा पुनर्वापर :


लोकसंख्येच्या तुलनेत पाणी कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे तेच ते पाणी पुन्ह: पुन्हा वापरावे लागणार आहे. आज तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे जल शुध्दीकरणाचे नवनवीन मार्ग सापडत आहेत. या मार्गांचा वापर करून पाण्याचा पुरवठा वाढविणे शक्य झाले आहे. सिंगापूर सारख्या देशात या मार्गाचा फार झपाट्याने वापर सुरू झाला आहे. अरब देश समुद्राचे पाणी शुध्द करून पिण्यासाठी सुध्दा वापरत आहेत. आज जरी नाही तरी उद्या आपल्याला सुध्दा याच मार्गाने जावे लागणार आहे.

पाण्याचे वाढते प्रदूषण :


पाण्याचा सर्वात महत्वाचा दुर्गूण म्हणजे ते कोणाशीही तात्काळ मैत्री करते. प्रदूषकांचा पाण्याशी संबंध आल्यास ते अगदी सहजपणे त्याच्या विळख्यात सापडते व चांगले शुध्द पाणी प्रदूषित होवून जाते. माणसाला होणार्‍या विकारांपैकी ९० प्रतिशत विकार प्रदूषित पाण्यामुळे होतात असे वैद्यक शास्त्र म्हणते. जिवाणू आणि विषाणू पाण्याच्या संपर्कात आले तर पाणी प्रदूषित होते. सध्या यामुळे नद्यांतील, तलावांतील एवढेच नव्हे तर भूगर्भातील पाणी सुध्दा प्रदूषित झाले आहे. यावर ताबडतोब उपचार न झाल्यास सामाजिक आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.

पाण्याचा उत्पादक कारणासाठी वापर :


आज जगात मोअर क्रॉप पर ड्रॉप ऑफ वॉटर चे नारे लावले जात आहेत. या मानाने आपण फारच मागासलेले आहोत. कारण पाण्याचा उत्पादकतेने वापर करण्यात आपण फारच मागे पडलो आहोत. आपल्याला देशात शेतीसाठी जी सिंचम व्यवस्था वापरली जाते तिला प्रवाही पध्दती म्हणतात. या पध्दतीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुर्वापर होतो व पाण्यासारखे दुर्मिळ संसाधन आपण वाया घालवितो. देशाची प्रगती करावयाची असेल तर पाणी अधिक उत्पादक पध्दतीने वापरावे लागेल.

पाण्याचे वितरण असमाधानकारक :


पाण्याच्या वापरात आज आपल्या देशात झुंडशाही आढळते. बळी तो कानपिळी याचा प्रत्यय आपल्याला या क्षेत्रात येतो. आपल्या देशात काही लोक अति खाऊन मरतात तर काही खायला न मिळाल्यामुळे मरतात. तीच परिस्थिती पाण्याचे बाबतीत आढळून येते. काही जमिनी अति सिंचनामुळे नापिक व्हावयास लागल्या आहेत तर काही पाणी न मिळाल्यामुळे नापिक आहेत. पाणी वितरण संस्था स्थापून त्यांचे हाती हा कारभार सोपवून आपल्याला पाण्याचे समान वितरण साधावायाचे आहे.

पाण्याचे सरकारीकरण धोक्याचे :


जी गोष्ट नीट सांभाळू शकतो तीच आपल्या हातात ठेवावी हे शहाणपण आपले सरकार कधी शिकणार नकळे. आज संपूर्ण पाणी प्रश्‍न सरकारमय झाला आहे. सरकारने मोठी धरणे बांधून ठेवली पण त्याची योग्य वितरण व्यवस्था न उभारल्यामुळे त्या पाण्याचा योग्य वापरच होत नाही. नागरी पाण्याचे वितरणही समाधानकारक नाही. जल वितरणात लोकांचा सहभाग नाही व त्यामुळे पाणी प्रश्‍न सरकार निर्मित तर नाहीना असे वाटावयास लागले आहे. जागतिक बँक आपल्याला पाणी व्यवस्था सुधारा असे वारंवार सांगत आहे. पण या क्षेत्रात केली जाणारी प्रगती अत्यंत धीम्या गतीने चालू आहे.

या सर्व प्रश्‍नांवर जलजागरण होणे आवश्यक आहे. जलदिनाच्या निमित्ताने यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. लोकांना प्रश्‍न समजला तरच त्याची उत्तरे शोधली जावू शकतील. म्हणून आपण सर्वांनी मिळून जागतिक जल दिन साजरा करू या व या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकू या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad